School scholarships : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दुर्बल घटक योजना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (NMMS) इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी खास शिष्यवृत्ती दिली जाते. या परीक्षेत यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीपासून थेट बारावीपर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये, म्हणजे चार वर्षांत एकूण 48 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.School scholarships
ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आठवी नंतर विद्यार्थ्यांची होणारी गळती थांबवणे आणि गरजू, गुणवत्तावान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक आधार देणे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून याचे नियोजन केले जाते.
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि शैक्षणिक क्षमता तपासली जाते. परीक्षेच्या पहिल्या पेपरमध्ये मानसिक क्षमता चाचणी असते, ज्यामध्ये तर्कशक्ती, विचारशक्ती आणि विश्लेषण क्षमता तपासणारे 90 प्रश्न असतात. तर दुसऱ्या पेपरमध्ये शालेय क्षमता चाचणी असते, ज्यात विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र (इतिहास व भूगोल) या विषयांवरील प्रश्न विचारले जातात. हे दोन्ही पेपर एकाच दिवशी घेतले जातात आणि प्रत्येकी 90 गुणांचे असतात.
ही परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये देता येते, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा सोपी आणि समजण्यासारखी ठरते. शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात नववीपासून बारावीपर्यंत दरवर्षी थेट 12 हजार रुपये जमा केले जातात.
पात्रतेच्या अटींबाबत बोलायचं झालं, तर इयत्ता आठवीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 55 टक्के गुण आवश्यक आहेत, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के गुणांची अट आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. केवळ मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थीच या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
यावर्षी 28 डिसेंबर रोजी ही शिष्यवृत्ती परीक्षा राज्यभरात घेण्यात येत आहे. राज्यातील 13 हजार 789 शाळांमधील तब्बल 2 लाख 50 हजार 532 विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून, परीक्षा 758 केंद्रांवर होणार आहे. परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी 11 जिल्ह्यांतील अतिसंवेदनशील 27 केंद्रांवर झूम कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट निरीक्षण ठेवले जाणार आहे.
परीक्षेच्या दिवशी सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत पहिला पेपर, तर दुपारी 1.30 ते 3 वाजेपर्यंत दुसरा पेपर होणार आहे. परीक्षेचे हे काटेकोर नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
एकूणच, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना शिक्षणाचा मार्ग मोकळा करणारी ठरत असून, योग्य माहिती आणि तयारी असेल तर विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांचा मोठा आर्थिक आधार मिळू शकतो. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा, असं चित्र सध्या दिसून येत आहे
हे पण वाचा | महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डिसेंबर महिन्यात या इतक्या दिवस शाळा राहणार बंद? काय कारण जाणून घ्या