Ration Card New Update: नवीन वर्षाची सुरुवात होत असतानाच राज्यातील कोट्यवधी शिधापत्रिकाधारकांसाठी रेशनबाबत एक महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर रेशनमध्ये ज्वारीचा समावेश करण्यात आला होता. मात्र आता सरकारने हा प्रयोग थांबवण्याचा निर्णय घेतला असून, १ जानेवारीपासून पुन्हा पारंपरिक पद्धतीने फक्त गहू आणि तांदूळच वितरित केला जाणार आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत अनेक लाभार्थ्यांना पहिल्यांदाच रेशनवर ज्वारी मिळाली. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं, तर अनेक ठिकाणी ज्वारी वापरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या. विशेषतः शहरी भागात ज्वारी दळण, स्वयंपाक आणि सवयींचा प्रश्न निर्माण झाला होता. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन शासनाने हा प्रयोग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जानेवारीपासून पुन्हा जुनीच रेशन पद्धत
राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत ठरवून दिलेल्या मूळ प्रमाणानुसारच आता धान्यवाटप होईल. म्हणजेच ज्वारीचा समावेश पूर्णपणे बंद होणार असून, लाभार्थ्यांना केवळ गहू आणि तांदूळ मिळणार आहे. Ration Card New Update
अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना किती धान्य मिळणार?
जानेवारी 2026 पासून अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना दरमहा –
- 21 किलो गहू
- 14 किलो तांदूळ
असे एकूण 35 किलो धान्य दिले जाणार आहे. हे प्रमाण पूर्वीप्रमाणेच असून, यामध्ये कोणताही कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही.
प्राधान्य कुटुंब योजनेत काय बदल?
प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दरमहा –
- 3 किलो गहू
- 2 किलो तांदूळ
असे धान्य मिळणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करण्यात आलेला ज्वारीचा बदल आता पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
वन नेशन, वन राशन कार्डमुळे मोठा फायदा
दरम्यान, वन नेशन, वन राशन कार्ड योजनेमुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. एखाद्या व्यक्तीचा राशन कार्ड उत्तर प्रदेशचा असला, तरी तो झारखंड, महाराष्ट्र किंवा देशातील कोणत्याही राज्यात राहून रेशन घेऊ शकतो. यासाठी नवीन राशन कार्ड काढण्याची गरज नाही. जुन्या कार्डवरच देशभरात रेशन मिळणार आहे.
ही योजना आधी 12 राज्यांमध्ये लागू होती, मात्र आता ती संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. यामुळे स्थलांतरित कामगार, मजूर वर्ग आणि गरजू नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. सरकारच्या मते, या योजनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि बनावट राशन कार्डवर नियंत्रण येईल.
रेशन व्यवस्था पुन्हा स्थिर होणार
एकूणच, ज्वारीचा प्रयोग बंद झाल्यामुळे रेशन वितरण पुन्हा ओळखीच्या आणि सोप्या पद्धतीने सुरू होणार आहे. अनेक कुटुंबांना धान्य वापराबाबत येणाऱ्या अडचणी आता दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन वर्षात रेशन व्यवस्थेत स्थैर्य येईल आणि लाभार्थ्यांना दिलासा मिळेल, हे मात्र नक्की.