Pm Kisan Yojana Update | देशातील करोडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदतीचा हात देणारी ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वर्षाला ६ हजार रुपये देणाऱ्या या योजनेचा २१ वा हप्ता गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या पदरात पडला. पण आता नवीन वर्षात २२ वा हप्ता कधी येणार? याची उत्सुकता प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनात आहे. अनेक दिवसांपासून या हप्त्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या, पण आता त्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.
२२ वा हप्ता फेब्रुवारीत येणार?
नियम सांगतो की, दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा व्हायला हवेत. खरं तर २१ वा हप्ता ऑक्टोबरमध्येच अपेक्षित होता, पण तो थोडा उशिराने म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान मिळाला. आता गणितानुसार, पुढच्या चार महिन्यांचा टप्पा फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये सरकार २२ व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची दाट शक्यता आहे.
५ दिवस उलटले तरी पैसे आले नाहीत? मग असं करा…
काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की, इतर शेतकऱ्यांचे पैसे आले पण आमचे का थांबले? जर तुमच्या बाबतीतही असे घडले असेल, तर अजिबात घाबरू नका. ५ दिवस उलटूनही पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर तक्रार करू शकता. अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पैसे रखडतात, जे तक्रार केल्यानंतर त्वरित मार्गी लागतात.
’या’ दोन गोष्टींशिवाय पैसा मिळणार नाही!
सरकारने आता नियमावली अधिक कडक केली आहे. केवळ शेती असून चालणार नाही, तर तुम्हाला खालील दोन गोष्टी पूर्ण कराव्याच लागतील:
१. ई-केवायसी (e-KYC): ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही, त्यांचे पैसे सरकार दरबारी अडकून पडणार आहेत.
२. फार्मर आयडी (Farmer ID): काही राज्यांमध्ये आता ‘फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आला आहे. ही कागदपत्रे तुमच्याकडे नसतील, तर तुम्हाला पात्र असूनही या लाभापासून वंचित राहावे लागेल.
कर्ज फेडलं नाही तर हप्ता बंद होणार का?
शेतकऱ्यांमध्ये सध्या एक मोठी अफवा पसरली आहे की, जर बँकांचे कर्ज फेडले नाही तर ६ हजार रुपये मिळणार नाहीत. पण शेतकरी मित्रांनो, तसा कोणताही अधिकृत नियम अद्याप आलेला नाही. कर्ज आणि सन्मान निधी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. मात्र, तुमची पात्रता टिकवून ठेवण्यासाठी केवायसी आणि बँक खाते आधारशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे.