Highway News :मराठवाड्यासाठी वर्षानुवर्षे चर्चेत असलेला आणि फक्त फाईलीत अडकलेला लातूर कल्याण द्रुतगती महामार्ग अखेर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या महामार्ग प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर आता या मार्गाबाबतची सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई लातूर प्रवास अधिक जलद सोपा आणि सुरक्षित व्हावा यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून मराठवाड्याच्या विकासासाठी हा महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचं बोललं जात आहे. Highway News
कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (MSRDC) मोठा प्रकल्प असून अनेक वर्षे याची फक्त चर्चा सुरू होती. पण नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाच्या सादरीकरणावर स्वतः लक्ष घालून तातडीने अंमलबजावणीचे निर्देश दिले. विधानसभेत अधिकृत घोषणेनंतर या प्रकल्पाला प्रत्यक्ष चालना मिळाली आणि आता एमएसआरडीसीने सल्लागारामार्फत महामार्गाच्या संरेखनाचे कामही सुरू केले आहे.
राज्य सरकारकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा नवा द्रुतगती महामार्ग एकूण सहा जिल्ह्यांतून जाणार आहे. यात ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव (उस्मानाबाद) आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. प्राथमिक रूटनुसार हा महामार्ग उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी,पाटोदा, बीड, केज, कळंब, लातूर औसा आणि निलंगा या भागांमधून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांना थेट दळणवळणाचा मोठा फायदा होणार आहे.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते लातूर हा प्रवास लक्षणीयरीत्या कमी वेळेत पूर्ण होईल. आज ज्या प्रवासासाठी 10 ते 12 तास लागतात तो प्रवास भविष्यात काही तासांत शक्य होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचा थेट फायदा शेतमाल वाहतूक उद्योग व्यापार शिक्षण आणि आरोग्य सेवांनाही होणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा माल थेट मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बाजारपेठेत पोहोचणे सोपे होणार आहे.
मात्र, महामार्गाच्या रूटवरून राजकीय पातळीवर हालचालींनाही वेग आला आहे. धाराशीव जिल्ह्यातून हा महामार्ग जावा यासाठी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्याला डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आमदार धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे अंतिम रूट कोणता असणार याकडे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागून आहे.
एमएसआरडीसीने मात्र स्पष्ट भूमिका घेतली असून तांत्रिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने योग्य ठरणारं संरेखनच अंतिम केलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. सध्या सुरू असलेलं अलाइनमेंट पूर्ण झाल्यानंतरच महामार्ग नेमका कोणत्या गावांमधून जाणार कुठे इंटरचेंज असतील आणि कुठल्या भागाला किती फायदा होणार याची अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे.
थोडक्यात सांगायचं तर अनेक वर्षांची प्रतीक्षा संपत असून लातूर कल्याण द्रुतगती महामार्ग आता प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी हा रस्ता फक्त महामार्ग न राहता आर्थिक संधींचा नवा मार्ग ठरणार आहे. आता फक्त अंतिम संरेखन आणि काम सुरू होण्याच्या घोषणेचीच प्रतीक्षा आहे.
हे पण वाचा : महाराष्ट्रात लवकरच मोठा महामार्ग होणार! केंद्र सरकारची मंजुरी पहा कसा असणार रूट