Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी दिलासादायक आणि मनाला समाधान देणारी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संदर्भात आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाखो महिलांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचल्या आणि त्यावर थेट उपाय काढत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची थेट आर्थिक मदत देणारी ही योजना अनेक कुटुंबांसाठी आधार बनली आहे. अलीकडेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याबाबत अनेक लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. दरम्यान, योजनेत अपात्र महिलांचा समावेश झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली.
सुरुवातीला केवायसीसाठी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांना वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा विचार करून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत केवायसीसाठी मुदतवाढ दिली. तरीसुद्धा प्रत्यक्षात गावागावात, वाड्यावस्त्यांवर महिलांना केवायसी करताना मोठ्या अडचणी येत असल्याचे चित्र समोर आले. अनेक लाभार्थी महिला अशिक्षित आहेत, काहींना मोबाईल वापरता येत नाही, तर काहींना कागदपत्रांची माहितीच नाही. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन फडणवीस सरकारने आता थेट माणुसकीचा निर्णय घेतला आहे.
आता केवायसीसाठी ‘अंगणवाडी सेविका’च मदतीला
लाडक्या बहिणींना कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी शासनाने केवायसीची जबाबदारी थेट अंगणवाडी सेविकांवर सोपवली आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. हा निर्णय म्हणजे खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी सेविकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून त्या गावपातळीवर लाभार्थी महिलांशी थेट संपर्क साधणार आहेत. त्यामुळे अनेक महिलांच्या मनातील भीती, गोंधळ आणि संभ्रम आता दूर होणार आहे. Ladki Bahin Yojana
पती आणि वडील नसलेल्या महिलांसाठीही मोठा दिलासा
या योजनेत आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ज्या महिलांचे पती आणि वडील दोघेही हयात नाहीत, अशा महिलांना केवायसी करताना मोठ्या अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन शासनाने वेबसाईटमध्ये आवश्यक बदल केले आहेत. संबंधित महिलांनी मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे सादर केल्यानंतर त्यांची ई-केवायसी तातडीने पूर्ण केली जाणार आहे.
हा निर्णय अनेक निराधार महिलांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. घरात कोणीही आधार नसताना सरकारने आपुलकीने घेतलेली ही दखल अनेक लाडक्या बहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. एकंदरीत पाहता, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता, महिलांच्या अडचणी समजून घेणारी आणि त्या दूर करणारी योजना ठरत असल्याचे चित्र आहे. सरकारचा हा नवा निर्णय खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा राहणारा ठरणार, यात शंका नाही.