Maharashtra Highway : महाराष्ट्राच्या दळणवळणाच्या नकाशावर लवकरच मोठा बदल दिसणार आहे. नागपूर ते गोवा असा थेट, वेगवान प्रवास शक्य करणाऱ्या शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, या महामार्गाचे संरेखन बदलण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ही माहिती दिली आणि त्यानंतर या प्रकल्पाला नव्या दिशेने गती मिळाल्याचे स्पष्ट झाले. Maharashtra Highway
राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या आधीच्या संरेखनावर वाढता विरोध लक्षात घेतला होता. शेतकरी, स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक संघटनांच्या आक्षेपांमुळे या महामार्गाच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सुधारित संरेखनामुळे आता महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे प्रस्तावित महामार्ग थेट एकमेकांशी जोडले जाणार असून, याचा फायदा राज्यातील अनेक जिल्ह्यांना होणार आहे.

नव्या बदलानुसार नागपूर–गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग थेट कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे राज्याचा पूर्व भाग, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. आज जिथे प्रवासासाठी ८ ते १० तास लागतात, तिथे काही तासांत हे अंतर पार करता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एमएसआरडीसीकडून कल्याण–लातूर–हैदराबाद द्रुतगती महामार्गाचे संरेखन तयार करण्यात आले असून, या महामार्गाला ‘जनकल्याण महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. कल्याण ते लातूर या सुमारे ४४२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करणार आहे. बदलापूरपासून सुरू होणारा हा महामार्ग लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे समाप्त होणार आहे.
हा महामार्ग सेवेत आल्यानंतर लातूर ते कल्याण हे अंतर अवघ्या चार ते साडेचार तासांत पार करता येणार आहे. औराद शहाजनी येथून पुढे हा मार्ग थेट हैदराबादपर्यंत जाणार असून, संपूर्ण मुंबई–हैदराबाद द्रुतगती महामार्गाची लांबी सुमारे ५९० किलोमीटर इतकी असेल. यामध्ये कर्नाटकातील ६१ किमी आणि तेलंगणातील ७९ किमी मार्गाचा समावेश असून, त्या टप्प्यांची अंमलबजावणी संबंधित राज्य सरकारांकडून केली जाणार आहे.
दरम्यान, नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात झालेल्या बदलांमुळे या महामार्गाची लांबी वाढून सुमारे ८४० किलोमीटर झाली आहे. आता या महामार्गातून महाराष्ट्रातील तब्बल १३ जिल्हे जोडले जाणार असून, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक मागास भागांना थेट दळणवळणाची मोठी संधी मिळणार आहे.
लातूर जिल्ह्यातील मुरूड येथील बार्शी रोडवर जनकल्याण आणि शक्तिपीठ महामार्गासाठी खास इंटरचेंज उभारण्यात येणार आहे. यामुळे लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड आणि धाराशीव जिल्ह्यातील नागरिकांना थेट मुंबई आणि गोव्याकडे काही तासांत प्रवास करणे शक्य होणार आहे. शेतमाल वाहतूक, उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होईल.
याचबरोबर भविष्यात हे दोन्ही महामार्ग विरार–अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे जेएनपीए बंदर, वाढवण बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. एकूणच या महामार्गांच्या जोडणीमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हे पण वाचा | महाराष्ट्र मध्ये हा नवीन मोठा हायवे होणार जवळपास याचा या १५३ गावांना फायदा होणार? वाचा सविस्तर