Heavy Rain Alert : नव्या वर्षाची सुरुवात होताच हवामानाने थेट वळण घेतलं आहे आणि गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण पाहिलं, तर फरक लगेच जाणवतो. डिसेंबरअखेर राज्यात कडाक्याची थंडी होती, सकाळ-संध्याकाळ हुडहुडी भरत होती, पण १ जानेवारी २०२६ च्या पहिल्याच दिवशी अनेकांच्या कल्पनेपलीकडे चित्र बदललं. अचानक ढग दाटले, जोरदार सरी कोसळल्या आणि थंडीच्या जोडीला पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज्यात दमदार पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून ढग जणू गायबच झाले होते, पण वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि आता भारतीय हवामान विभागाने थेट पुढील काही दिवसांचा इशाराच दिला आहे. Heavy Rain Alert
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार २, ३, ४ आणि ५ जानेवारी दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांमध्ये गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर आभाळ भरून राहण्याची आणि अधूनमधून सरी कोसळण्याची शक्यता आहे. जानेवारीत थंडी असते, हा सगळ्यांचा अनुभव आहे, पण यंदा थंडीबरोबर पाऊसही हातात हात घालून येतोय, हेच सध्या सर्वसामान्यांना अधिक जाणवत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, जानेवारी महिन्यातही राज्यातून पाऊस पूर्णपणे जाणार नाही. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत थंडीची लाट कायम राहणार असून, त्याचवेळी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही थंडीचा जोर टिकून राहणार आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ, गाझियाबाद, नोएडा, हापूर, बागपत, बुलंदशहर, सहारनपूर, शामली, मोरादाबाद, बिजनौर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २ ते ५ जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्येही पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दुसरीकडे दक्षिण भारतातही चित्र वेगळं नाही. तामिळनाडूच्या काही भागांमध्ये २ आणि ३ जानेवारी रोजी जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात हवामान सतत बदलत आहे, कधी कडाक्याची थंडी, तर कधी अचानक पावसाचा मारा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाने डोके वर काढले असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. वाढत्या प्रदूषणावर न्यायालयांनीही चिंता व्यक्त केली असून महापालिकांना फटकारले आहे.
एकूणच पाहिलं, तर पुढील २४ तासांपासून ते ५ जानेवारीपर्यंत हवामान अस्थिरच राहणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. शेतकरी असो, प्रवासी असो किंवा शहरात रोजच्या कामासाठी बाहेर पडणारा सामान्य नागरिक असो, सगळ्यांनाच या बदलत्या हवामानाचा फटका बसू शकतो. त्यामुळे हवामान विभागाचे अपडेट्स लक्षात ठेवूनच पुढील दिवसांचे नियोजन करावे, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. नव्या वर्षात हवामानाचा हा अनपेक्षित खेळ पुढे आणखी काय रंग दाखवतो, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले आहे.
1 thought on “या तारखेला राज्यात होणार तुफान गारपीट? हवामान खात्याचा मोठा इशारा पहा नवीन अंदाज”