Ladki Bahin Yojana: महायुती सरकारसाठी मोठा राजकीय आधार ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. राज्यभरात या योजनेचा लाभ सध्या २ कोटी ४७ लाख महिलांना मिळत असताना, यातील तब्बल ४० लाखांहून अधिक लाभार्थी महिलांचे भवितव्य सध्या अनिश्चित अवस्थेत आहे. कारण या महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत या महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी महत्त्वाची माहिती महिला व बालविकास विभागातील सूत्रांकडून समोर आली आहे.
राज्य सरकारने या योजनेसाठी पात्र महिलांना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले होते. मात्र आतापर्यंत केवळ सुमारे १ कोटी ६० हजार महिलांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाखो महिलांची माहिती अद्याप शासनाच्या प्रणालीत अपडेट झालेली नसल्याने अंतिम लाभार्थी यादी तयार करताना या महिलांची नावे वगळली जाऊ शकतात, असे संकेत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आली होती. या योजनेचा थेट फायदा महायुती सरकारला निवडणुकीत मिळाल्याचं बोललं जातं. मात्र योजना सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे, तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा फायदा उचलल्याचे प्रकार समोर आल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली होती. यानंतरच महिला व बालविकास विभागाने लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला लाभार्थी महिलांना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील विविध भागांत आलेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सरकारने ही मुदत वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत दिली. तरीदेखील मोठ्या प्रमाणावर महिलांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित असल्याचे चित्र आहे. Ladki Bahin Yojana
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या अनुदान वितरणावर आचारसंहितेचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही योजना आधीपासून सुरू असल्याने तिच्यावर कोणताही प्रतिबंध लागू होणार नाही. मात्र, ई-केवायसी न केल्यास आचारसंहिता नाही तर थेट अपात्रता हेच कारण ठरणार असल्याचेही स्पष्ट संकेत दिले जात आहेत.
थोडक्यात सांगायचं झालं, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढेही हवा असेल, तर ई-केवायसीकडे दुर्लक्ष करणं महिलांना महागात पडू शकतं. ३१ डिसेंबरनंतर लाभार्थी यादी अंतिम झाली, तर ज्यांची माहिती अपडेट नसेल, त्यांची नावं थेट योजनेतून वगळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजूनही ई-केवायसी न केलेल्या महिलांसाठी हा शेवटचा इशारा मानला जात आहे.
1 thought on “लाडकी बहीण योजनेमधून 40 लाख महिला पात्र यादीत तुमचे तर नाव नाही ना? एकदा चेक करा”