Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी महिलांच्या नजरा सध्या एकाच प्रश्नावर खिळलेल्या आहेत. आपले पैसे नेमके कधी येणार? डिसेंबर महिना संपायला मोजकेच दिवस शिल्लक असताना देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अद्याप खात्यात न आल्याने अनेक घरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सणासुदीचे दिवस, घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधपाणी… या सगळ्याचा मेळ घालताना लाडक्या बहिणींना या पैशांची नितांत गरज आहे.
गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये शासनाने ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा केला होता. त्यामुळे डिसेंबरमध्ये निदान नोव्हेंबरचा तरी हप्ता येईल, अशी आशा महिलांना होती. मात्र दिवसामागून दिवस जात असतानाही खात्यात पैसे न आल्याने निराशा वाढत चालली आहे. “सरकार विसरलं की काय?” असा सवाल अनेक महिलांच्या मनात घोळत आहे.
दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असून महापालिका निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेमुळे निवडणुकीची चुरस अधिकच वाढली आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून महिलांसाठी एखादी मोठी घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता एक दिलासा देणारी चर्चा सुरू झाली आहे. शासनाकडून लाडकी बहीण योजनेचे प्रलंबित हप्ते मकर संक्रांतीआधी वितरित केले जाऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण असून, हा सण महिलांसाठी गोड बातमी घेऊन येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. Ladki Bahin Yojana Scheme
जर ही माहिती खरी ठरली, तर लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे मिळून ₹३००० जमा होऊ शकतात. इतकेच नव्हे, तर काही स्तरावरून अशीही चर्चा आहे की जानेवारी महिन्याचाही हप्ता एकत्र दिला गेला, तर थेट ₹४५०० महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे सध्या “₹३००० की ₹४५००?” हा प्रश्न महिलांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही माहिती शक्यतेवर आधारित आहे. तरीही निवडणुकांचा काळ, महिलांचा मोठा मतदार वर्ग आणि सणासुदीचे दिवस लक्षात घेता सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहावा यासाठी केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. शासनाने यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे. ज्या महिलांनी अद्याप केवायसी केलेली नाही, त्यांना पुढील हप्त्यांपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे “पैसे कधी येतील?” याची वाट पाहत बसण्याऐवजी केवायसीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे हेच शहाणपणाचे ठरेल.
आज अनेक महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही फक्त सरकारी योजना राहिलेली नाही, तर ती घर चालवण्याचा आधार बनली आहे. कुणासाठी औषधांचा खर्च, कुणासाठी शाळेची फी, तर कुणासाठी रोजचा संसार या पैशांवर अनेकांची गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे हप्ता उशिरा झाला की घरातली चिंता लगेच चेहऱ्यावर दिसते.
आता सगळ्यांच्या नजरा मकर संक्रांतीकडे लागल्या आहेत. हा सण फक्त तिळगुळापुरता न राहता, लाडक्या बहिणींसाठी आर्थिक गोडवा घेऊन येतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत शासनाच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवणे, हेच महिलांच्या हाती आहे. सरकार निर्णय घेईल तेव्हा घेईल; पण लाडक्या बहिणींच्या आशा मात्र अजून जिवंत आहेत.