PM Kisan 22nd Installment | राज्यातील आणि देशातील तमाम बळीराजा सध्या एकाच गोष्टीची चातकासारखी वाट पाहत आहे, ती म्हणजे ‘पीएम किसान’ योजनेचा २२ वा हप्ता! शेतीची कामं, खतं-बियाण्यांचा खर्च आणि घरखर्च या सगळ्याला हातभार लावणारी ही हक्काची रक्कम कधी जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोइम्बतूरमधून २१ वा हप्ता ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. आता दोन महिने उलटून गेल्यानंतर, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पात पैशांचा पाऊस पडणार?
येत्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. चर्चा अशी आहे की, या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी सरकार मोठी तरतूद करू शकते. सध्या वर्षाला मिळणारे ६,००० रुपये वाढवून ८,००० किंवा ९,००० केले जातील का? अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. जर अर्थसंकल्पात बजेट वाढवले, तर त्याचा थेट फायदा तुमच्या खिशाला होणार आहे.
२२ वा हप्ता नेमका कधी मिळणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, साधारण २८ फेब्रुवारीच्या सुमारास २२ व्या हप्त्याचे २,००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे फेब्रुवारी महिना शेतकऱ्यांसाठी ‘आर्थिक’ दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
तुमचा हप्ता अडकू शकतो, ‘हे’ काम तातडीने करा!
अनेका तक्रार असते की, “आमच्या शेजाऱ्याचे पैसे आले, पण आमचे नाही.” याचे मुख्य कारण म्हणजे ‘डीबीटी’ (DBT) सक्रिय नसणे. सरकार आता थेट बँक खात्यात पैसे जमा करते, त्यासाठी तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे आणि डीबीटी पर्याय चालू असणे अनिवार्य आहे. जर तुमचे गेल्या काही महिन्यांचे हप्ते मिळाले नसतील, तर आजच आपल्या बँक शाखेत जाऊन हा तांत्रिक अडथळा दूर करा.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा
दुसरीकडे एक चिंतेची बातमीही समोर येत आहे. अपात्र ठरल्यामुळे किंवा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे महाराष्ट्रातील तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे एकदा पोर्टलवर जाऊन नक्की तपासा.
आमचा विचार:
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. निसर्गाची साथ कधी मिळते तर कधी नाही, अशा वेळी ही सरकारी मदत शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी महत्त्वाची ठरते. केवळ मदतीवर अवलंबून न राहता, आधुनिक तंत्रज्ञान आणि अशा सरकारी योजनांचा योग्य ताळमेळ बसवला, तर बळीराजा नक्कीच सुखी होईल.